या यात्रेनिमित्त नाथनगरीतून सिद्धनाथांची चांदीने मढवलेल्या रथातून पालखी सवाद्य लावाजम्यासह भाविक भक्तांच्या मोठ्या उत्साहात निघते. घोडेखुर, धावडवाडी, कानकात्रेवाडी, आवटेवाडी व नेलकरंजी या गावांमध्ये भाविकांचा नैवेद्य व कपड्यांचा आहेर आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. नेलकरंजी येथे सायंकाळी पाचपर्यंत श्री नाथांची पालखी थांबते. येथे मोठ्या थाटात भाविक स्वागत करतात.
सायंकाळी पाचनंतर मानेवाडी व मेटकरवाडी भाविकांचा मान-सन्मान घेऊन पालखी सायंकाळी जकाईदराकडे रवाना होते. जकाईदरा येथे मुक्काम असतो. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. आटपाडीसह अन्य तालुक्यांतीलही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनास येत असतात. निसर्गरम्य परिसर व डोंगरकपारीत असणारे जकाई मंदिर मोठे आकर्षण आहे. सायंकाळी पाचनंतर श्री नाथांची पालखी जकाईदरा येथून परतीच्या मार्गावर निघते.
या यात्रेचे आयोजन श्री सिद्धनाथ जकाई देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यात्रेच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे