![]() | ||
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू करणार नेतृत्व ! |
गणपतीपुळे :
रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे येथील लोकवस्तीत होणारे जिंदाल कंपनीचे गॅस टर्मिनल स्थलांतर व्हावे या मागणीकरिता २८ मे रोजी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चू कडू यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.
जिंदाल गॅस टर्मिनल प्रकल्प लोकवस्तीतून निर्मनुष्य ठिकाणी स्थलांतर व्हावे व स्थानिक ग्रामस्थ या महाभयानक संकटातून कायमचे मुक्त व्हावे यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना
न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे. २८ मे रोजी बेमुदत आंदोलन करताना असे सांगण्यात आले आहे की गॅस टर्मिनलची नियोजित जागा ही वस्तीच्या मध्यवर्ती नांदिवडे च्या माथ्यावर आहे. त्यामुळे गॅस टर्मिनल चा कधीतरी स्फोट होऊ शकतो. या स्फोटाने परिसरातील लोक मरतील, भाजतील, अपंग होतील हे निश्चित आहे. तसेच दररोज टँकर मध्ये गॅस भरताना मोठ्या प्रमाणात वास येणार आहे.
या वासाने परिसरात आजार वाढणार आहेत. तसेच दक्षिणेकडून उत्तरेला वारे वाहतील तेव्हा माध्यमिक विद्यामंदिर जयगड, घोगळवाडी, कुंभारवाडी, साखरमोहल्ला
बौद्धवाडी, गणेशवाडी, जयगड व उत्तर नांदिवडेला मोठ्या प्रमाणात वास सहन करावा लागणार आहे. तसेच जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेला वारे वाहतील तेव्हा पहिले अंबु, संदखोल, वाकणवाडी, कचरे, चाफेरी, सांडेलावगण ते अगदी खंडाळ्यापर्यंत वास जाणार आहे. तसेच वारा नसेल तेव्हा व इतर वेळेला पहिले अंबु, वाकणवाडी, संदखोल, अंबुवाडी, बागवाडी, घोगळवाडी, यांना वास सहन करावा लागणार आहे. त्याच बरोबर गॅसच्या वासाने दम लागणे, श्वास कोंडणे, त्वचेला खाज येणे, लकव्या सारखे प्रकार असे विविध आजार होणार आहेत. तेव्हा गॅस टर्मिनल लोक वस्तीतून स्थलांतर झालाच पाहिजे या मागणीसाठी बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे