पुणे, ३० मे २०२५ – हडपसरमधील गोळीबाराच्या धक्कादायक घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी या घटनेचे ठपके थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारवर ठेवले.
ही गुन्हेगारीची विकृती आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेची पूर्णपणे चाळण झाली आहे. गुन्हेगारांना थेट राजकीय आश्रय दिला जात आहे.
ही घटना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाकडून घडली असून, त्याने गावठी कट्ट्याने हवेत गोळी झाडली आणि त्या गोळीचा फटका त्याच्या नातेवाइकाला बसला. या प्रकारामुळे पोलिस प्रशासन आणि सरकारची जबाबदारी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
"जर सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते खुलेआम पिस्तुल घेऊन फिरत असतील, तर मग पोलिसांचं काम काय? कायदा सर्वांसाठी सारखाच आहे की राजकीय कार्यकर्त्यांसाठी वेगळा?" असा थेट सवाल करत भास्कर जाधव यांनी सरकारला जाब विचारला.
शेवटी त्यांनी सरकारला इशारा दिला की, "जर अशा घटना वेळीच थांबवल्या नाहीत, तर सामान्य नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडेल. गुंडांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा बंदोबस्त करण्याची वेळ लवकरच येईल."
या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी आणि राजकीय हस्तक्षेप यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.