अमरावती आणि परिसरात 3.8 तीव्रतेचा भूकंप; कोणतीही हानी नाही

0

अमरावती, ५ जून — अमरावती जिल्ह्यात बुधवारी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही, अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभाग व राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. खंडवा जिल्ह्यापासून सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर हे केंद्र असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. यामुळे अमरावतीसह मध्य प्रदेशातील खंडवा आणि बुरहानपूर जिल्ह्यांमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. कोहदाद, बोरगाव, मपूर (खंडवा जिल्हा) तसेच नेपानगर (बुरहानपूर) या भागातही धक्के जाणवले. या भागात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा झिरपाट जमीनखाली झाला आहे. त्यामुळे जमिनीच्या अंतर्गत थरात दडपण निर्माण होऊन अशा प्रकारचे सौम्य भूकंप होण्याची शक्यता असते, असे भूकंप अभ्यासकांचे मत आहे.

यापूर्वीही, ३० सप्टेंबर २०२४ रोजी अमरावतीच्या चिखलदरा, अंजनगाव सूर्जी आणि अचलपूर तालुक्यांमध्ये ४.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या वेळी देखील मेळघाट व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात धक्के जाणवले होते.

सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात मान्सून रेषा सक्रिय होत असल्याने जमिनीच्या तापमानात बदल होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नैसर्गिक हालचाली अधिक जाणवण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top