दि. 11 जून 2025 | नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारताची दहशतवादविरोधी भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांची भेट मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. या शिष्टमंडळांमध्ये विविध राजकीय पक्षांचे खासदार, माजी खासदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
या नेत्यांनी विदेशातील विविध मंचांवर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणांचे सुस्पष्ट स्पष्टीकरण देत, पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी भारताची बाजू मांडताना आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या सुरक्षेच्या धोरणांबद्दल जागरूक केलं.
शिष्टमंडळाचे नेतृत्व शशी थरूर, रवीशंकर प्रसाद, सुप्रिया सुळे, कनिमोझी यांसारख्या प्रमुख नेत्यांनी केलं. हे दौरे भारताच्या मुत्सद्दी धोरणाचा भाग म्हणून राबवण्यात आले होते.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं, ज्यामध्ये पाकिस्तान अधिकृत काश्मीर (POK) मधील 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींनी या शिष्टमंडळांचे अभिनंदन करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक ठामपणे मांडण्याची गरज अधोरेखित केली.